Search best Flipkart deals

Monday, October 20, 2014

नोटेची कथा


एका ख्यातनाम वक्त्याने हातात
पाचशेची नोट फडकावीत भाषणाला सुरुवात
केली. समोर बसलेल्या शेकडो श्रोत्यांना
त्याने प्रश्न केला,"ही पाचशेची नोट कुणाला
हवी आहे?" हळूहळू करता करता असंख्य
जणांनी हात वर केले. मग तो वक्ता म्हणाला,
"आपणापैकी कुणा एकालाच मी ही पाचशेची
नोट देणार आहे, पण त्यापूर्वी मला हे करू
द्या." असं सांगत त्याने ती नोट चुरगाळून
टाकली आणि पुन्हा श्रोत्यांना प्रश्न केला,
"आता ही नोट कुणाला हवी आहे?"
श्रोत्यांमधून पुन्हा एकवार असंख्य हात
उंचावले. "अच्छा ! आणि मग मी असं केलं
तर?" असं म्हणून त्यानं ती नोट पायदळी
तुडवली आणि हाताने उचलून मातीने मळलेली
आणि पूर्ण चुरगळलेली ती नोट सर्व
श्रोत्यांना दाखवीत पुन्हा प्रश्न केला,"आता
ही नोट कुणाला हवी आहे?" श्रोत्यांमधून
तरीही पुन्हा एकवार असंख्य हात उंचावले. मग
त्या वक्त्याने या घटनेचं निरूपण केलं,"आज
आपण एक आयुष्यातला खूप मोठा धडा
शिकलो आहोत. या नोटेबाबत मी काय वाट्टेल
ते केलं, तरीही ही नोट स्वीकारण्याची तुमची
तयारी होती. कारण या नोटेसोबत मी काहीही
केलं- म्हणजे तिला चुरगळलं, पायदळी तुडवलं
तरी तिचं पाचशे रुपये हे मूल्य अबाधित आहे,
याची जाणीव तुम्हाला होती. आयुष्यात खूप
वेळा असं घडतं, की आपण घसरतो, पडतो,
हरतो. खूप वेळा आपले निर्णय आपणाला
जमीनदोस्त करतात आणि आपणाला वाटू
लागतं की, आपली काहीच किंमत नाही. पण
आपणासोबत जे झालं किंवा भविष्यात जे काही
होणार आहे, त्यामुळे आपली किंमत कमी
होणार नाही, याची स्वतःच्या मनात खात्री
बाळगा. भूतकाळातील काळोखाचा भविष्यातील
उषःकालावर परिणाम होऊ देऊ नका. तुमचं
आयुष्य ही तुम्हाला मिळालेली अतिशय
मौल्यवान गोष्ट आहे. आयुष्यातील पडझडींनी
त्याचं मूल्य तसूभरही कमी होणार नाही."

Saturday, September 13, 2014

अंडे आणि वीट

कोंबडीचे अंडे
आणि घराच्या बांधकामासाठी वापरण्यात
येणारी विट यांच्यात एका बाबतीत साम्य
आहे ते कोणत्या बाबतीत आहे ?
जरा ओळखुन दाखव!”
मित्राने माझ्यापुढे कोडे टाकले.
मला विचारचक्रात अडकवुन स्वतः पसार
झाला.
मी विचार करु लागलो,
“बांधकामाची विट आणि कोंबडीचे अंडे यात
काय साम्य असणार?”
खुप विचार करुनही उत्तर न सापडल्यामुळे
शेवटी शेजारी सुरु
असलेल्या बांधकामावरुन दोन
विटा आणि बाजारातुन अर्धा डझन
अंडी घेउन घरी आलो. खूप निरीक्षण केले
पण उत्तर सापडले नाही.
दुसर्या दिवशी तोच मित्र पुन्हा माझ्याकडे
आला,
“काय सापडले काय उत्तर?”
मी नकारार्थी मान हलविली आणि
“आता तुच काय ते साम्य दाखवं!”
असे म्हणुन ती अंडी आणि विटा त्याच्यापुढे
ठेवल्या .
मित्राने हातात अंडे घेतले.
ते उभे ठेवले आणि दाबले, पण ते फ़ुटले नाही .
अंड्याला आडवे केले आणि दाबले, ते
चटकन फुटले.
मग त्याने दोन फ़ुटावरुन हातात
उभी धरलेली विट खाली सोडली,
विटेला काहीच झाले नाही.
मग तेवढ्याच अंतरावरुन त्याने आडवी धरुन विट
खाली सोडली, आता मात्र विट फुटली.
“विट आणि अंडे उभे असेपर्यंत फ़ुटत
नाही, आडवे होताच फ़ुटते. हे
त्या दोघांमधील साम्य”
माझा मित्र मला सांगत होता.
खरोखर विचार करता उभे अंडे किंवा विट
आडवी होताच फ़ुटली होती. डोक्यात
विचारचक्र सुरु झाले.
माणुस त्या विट किंवा अंड्यासारखाच.
तो जोपर्यंत खंबीरपणे उभा आहे, सजग आहे,
तो पर्यंत कोणीच त्याचे भवितव्य बिघडवू
शकत नाही.
पण जर का तो सुस्तावला,
जरा आडवा झाला, की त्याचे भवितव्य
फ़ुटण्याची शक्यता बळावते.
“सदैव खंबिरपणे उभे राहा. जग तुमचे
काही बिघडवू शकत नाही”
अंडी आणि विट कदाचित हाच संदेश देत
असावे.....!!

Sunday, September 7, 2014

आयुष्याच्या डायरीतून काही टिप्स.......


* आपणास नक्की काय करायचे आहे हे ठरवा .
त्या नुसार काही तरी Plan करा . नुसते
काही तरी करायचे
म्हणून काही करु नका . नेहमी लक्षात असू द्या
Failing to plan is planning to fail.
* यशस्वी होण्यासाठी फार काही वेगळे
करायची गरज नसते
जे काही करता त्यात मात्र वेगळेपणा जपा .
* Adjustment आणि तडजोड हे शब्द नेहमी वापरात
आणा.
अट्टाहासापायी अडून बसण्यापेक्षा हळूहळू करत पुढे
गेलेले केव्हाही चांगले
* वेळेचे भान ठेवा . केव्हा कुठे आणि कीती वेळ
द्यायचा
याचे नियोजन करा . वेळ
वाया घालवायपेक्षा सत्कारणी लावा
* एक चूक एकदाचं . चुकायला घाबरु
नका .चुकतो तोच शिकतो .
चूकले म्हणून हळहळत बसू नका . चूक लक्षात
आली की लगेचं सुधारा
* बदल पहायचा आहे मग स्वतःत आधी त्यानुसार
बदल करा
मग दुसर्याला बदलायला .
* जे काही कराल ते आनंदाने करा त्याची मजा घेत
ती गोष्ट करा.
त्याला अनूभवा . ह्या मुळे
कामाचा कंटाळा नाही येत व निम्मे अडचणी
आधीचं गायब होतात....
* कसलीही सुरुवात
करताना आधी माहीती त्या बद्दल मिळवा ,
मग कामाला लागा . प्रामाणिकपणे मेहनत करा .
योग्य वेळी output नक्कीचं मिळते
मेहनत कधीचं वाया नाही जात .......
* नेहमी इतरांशी स्वतःची तुलना करत बसू नका .
असे करुन स्वतःची किंमत कमी होते . एक
नेहमी लक्षात असू द्या
आपण जगात सगळ्यात अनमोल आहोत......
* प्रत्येकास सारे जग बदलायचे आहे थोडे
स्वतःच्या दॄष्टीकोनात आणि स्वतःत थोडा बदल
करुन पहा जग बरेचं बदललेले दिसेल....
* आज जो विचार कराल ते लगेचं नाही होणार .
पण उद्या काय होणार आहे
हे आज केलेल्या विचारवर अवलंबून आहे . Think Big Do
Big ...
* कसलीही सुरुवात करताना नकारात्मक विचार
करु नका
सुरुवात नकारात्मक केली तर अर्धी लढाई आपण
सुरुवात न करताचं हरतो
* अशक्य हे शक्य असते फक्त त्या कडे कसे पहातो तसे ते
दिसते
* जीवनात नेहमी काही तरी अपूर्णचं असते म्हणून
परिपूर्ण असयचा
प्रयत्न करा
* नेहमी आनंदी असा जीवनाची मजा घ्या , हर एक
क्षण जगा .

Thursday, August 7, 2014

शिक्षक आणि मुले

“शनिवार जाईल, रविवार जाईल,
आणि सोमवारी तुम्ही नेहमीसारखेच शाळेत जाल
आणि पहिल्या तासावर आपल्या वर्गात शिराल. अशाच
मिसेस साठे आपल्या वर्गात शिरल्या.
इंग्रजी माध्यमाची शाळा होती. साठे बाईना वर्गात बोलणे
सुरु करताना “love you All” असं म्हणायची सवय होती.
तसं त्या म्हणाल्याही. पण त्याना जाणवलं कि आपण हे खर
मनापासून म्हणत नाही आहोत. त्याला कारण
शेवटच्या बाकावर बसणारा एक मुलगा होता.
तो मुलगा अगदी अव्यवस्थित,
गबाळ्या असा होता आणि साठे बाईना त्याच्याबद्दल प्रेम
किंवा आत्मीयता वाटेल असं, त्यांची दखल घ्यावी असं,
त्या मुलात काहीही नव्हत! त्या,
त्या मुलाशी जरा अलिप्तपणेच वागायच्या.
कोणत्याही नकारात्मक गोष्टींसाठी त्याचं उदाहरण
द्यायच्या. आणि कोणत्याही सकारात्मक गोष्टींच्या बाबतीत
त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करायच्या.
पहिली तिमाही झाली. प्रगती पुस्तक लिहायचे दिवस आले.
त्याही मुलाची ‘प्रगती’ त्यांनी लिहिली. शाळेची अशी पद्धत
असते कि प्रगतिपुस्तकावर मुख्याध्यापिकेची सही होते.
त्या प्रमाणे प्रगती पुस्तके सही साठी गेली.
मुख्याध्यापिकेने साठे बाईना बोलवून घेतले. त्या म्हणाल्या,
“अहो प्रगतिपुस्तकात ‘प्रगती’ लिहायची असते.
पालकांना कळायला हवे कि त्यांच्या मुला-
मुलीना काही भवितव्य आहे. या शैलेश बद्दल तुम्ही काहीच
लिहिले नाहीये. अस कसे चालेल? त्याच्या पालकांना काय
वाटेल? अहो त्याला ते मारतील सुद्धा एखादेवेळी!” साठे बाई
म्हणाल्या, “ मी त्या मुलाच करू तरी काय? अहो,
सकारात्मक काही नसेल, काही प्रगती नसेलच तर मी काय
लिहू?” “ठीक आहे, तुम्ही वर्गावर जा.”
मुख्याध्यापिका म्हणाल्या.
मुख्याध्यापिकेने लगेच शाळेची कागदपत्रे
सांभाळणार्या व्यक्तीला बोलावून घेतले
आणि शैलेशची जुनी प्रगतिपुस्तके काढून आणायला सांगितले.
आणि शैलेशची जुनी प्रगतिपुस्तके साठे बाईंकडे पाठवून दिली.
साठे बाईनी प्रगतिपुस्तके चाळायला सुरुवात केली.
तिसरीच्या प्रगतीपुस्तकावर शेरा होता, “शैलेश हा वर्गातील
सगळ्यात हुशार विद्यार्थी आहे!”
त्याना आश्चर्याचा धक्काच बसला. त्यांनी चवथीचे
प्रगतीपुस्तक पाहिले, त्यात असलेले दर तिमाहीचे शेरे असे
सुचवत होते कि, त्याच्या प्रगतीचा आलेख हळूहळू
खाली येतो आहे.
त्याच्या आईला दुर्धर कॅन्सरने ग्रासले होते आणि रोग
आता शेवटच्या स्थितीत पोचला होता. त्यांची आई
त्याच्याकडे आता पूर्वीसारखे लक्ष देऊ शकत नव्हती.
आणि ते हळूहळू त्या शेऱ्यामधून ध्वनीत होत होते. सहावीत
शेरा होता, “ शैलेशने त्यांची आई गमाविली आहे,
आणि तो स्वत:हि हरवल्यागत झाला आहे. आता त्याच्याकडे
अधिक लक्ष देण्याची नितांत गरज आहे. नाहीतर आपण
त्याला गमावू!
आतापर्यंत साठेंच्या डोळ्यात अश्रू साठले होते. त्या तशाच
मुख्याध्यापिका कक्षात गेल्या. म्हणाल्या, “मला कळले
काय करायला पाहिजे ते!”
त्या जेंव्हा पुन्हा सोमवारी वर्गावर गेल्या आणि वर्गावर
नजर फिरवली, आणि, नेहमी प्रमाणे म्हणाल्या, “love you
All”! पुन्हा त्याना जाणवलं कि आपण खर बोलत नाही आहो.
कारण त्याना वर्गातल्या सर्व मुलांबद्दल
वाटणाऱ्या प्रेमापेक्षा कैक पटींनी जास्त माया आता शैलेश
विषयी वाटत होती!
त्यांनी आता मनाशी काही ठरवलं होत. आता शैलेशला हाक
मारताना त्यांचा स्वर बदलला होता.
त्या शैलेशशी सकारात्मक वागत होत्या. दिवस जात होते.
शाळेचा शेवटचा दिवस उगवला. सगळ्या मुलांनी teacher
साठी छान-छान गिफ्ट्स आणल्या होत्या. एकच ‘गिफ्ट’
एका जुन्या वर्तमानपत्रात गुंडाळलेली होती.
शिक्षिकेच्या अंत:प्रेरणेने त्यानी ओळखले हि कोणाची गिफ्ट
आहे ते. एक अर्धी वापरलेली परफ्युमची बाटली आणि दोन
खडयांच्या बांगड्या. एका बांगडीतले दोन खडे आधीच
निखळलेले होते. सगळी मुले हसली. त्यानी ती गिफ्ट
शैलेशची आहे हे ओळखल.
काही न बोलता साठे बाईनी तो परफ्युम आपल्या साडीवर
उडवला. त्या दोन बांगड्या आपल्या हातात घातल्या.
आता शैलेशचा चेहेरा खुलला. हलकेच हसून तो म्हणाला,
“आता माझ्या आईसारखाच सुगंध तुमच्या साडीला येतोय!”
“ती मला सोडून गेली त्या आधी तिने
वापरलेला हा शेवटचा परफ्युम होता.
आणि शेवटी तीच्या हातात ह्याच बांगड्या होत्या!”
एक वर्षानंतर, म्हणजे शाळा संपली तेंव्हा, साठे
बाईंच्या टेबलावर एक पत्र होते. “मला जेव्हढे शिक्षक-
शिक्षिका लाभल्या, त्यातल्या तुम्ही सर्वात छान आहात.”
शैलेश. त्या नंतर, बरीच वर्षे, दर वर्षी, शैलेशकडून याच
आशयाचे पत्र त्याना मिळत असे.
वर्षे निघून गेली. त्यांचा संपर्क राहिला नाही. दरम्यान
त्या निवृत्तही झाल्या. अचानक त्याना एक कुरिअर शोधत
आला. त्याने एक पत्र त्याना दिले. त्यावर प्रेषक महणून
नाव होत, डॉ. शैलेश, ph.D. या दरम्यान शैलेश
मोठा झाला होता. शैलेशने खूप प्रगती केली होती. डॉक्टरेट
मिळविली होती.
पत्रात तीच ओळ पुन्हा होती. थोड्या फरकाने. “मला जगात
खूप माणसे भेटली. पण तुम्ही सर्वात छान आहात!” “मी लग्न
करतोय. आणि, तुमच्या उपस्थितीशिवाय लग्न
करण्याचा मी स्वप्नातही विचार करू शकत नाही.” सोबत
विमानाची दोन तिकिटे होती. जायचे आणि यायचे. साठे
बाईंकडे आता तो परफ्युम नव्हता. पण त्या बांगड्या मात्र
अजूनही त्यांच्या हातात होत्या.
साठे बाईना राहवले नाही. त्या लग्नाला गेल्या. तिथे
अपरिचितच जास्त होते त्या मुले त्या मागच्या एका रांगेत
बसून चाललेला सोहळा पहात होत्या. मात्र
कुणीतरी त्याना शोधत होते. त्यांनी त्याना ओळखले
आणि पहिल्या रांगेकडे नेले. तिथे एका खुर्चीवर
चिट्ठी लावलेली होती. “आई”. शैलेश त्याना पाहून
सोहळा थांबवून त्यांच्या पाशी आला. त्याने त्यांना सन्मानाने
खुर्चीवर बसविले. पाया पडला आणि म्हणाला,
तुम्ही माझ्या आई पेक्षा कमी नाही. आज मी जो काही आहे
तो तुमच्या मुळे.
लग्न पार पडले. जोड्याने
पुन्हा पाया पडायला आला तेंव्हा नवपरिणीत
पत्नीला म्हणाला, “ह्या नसत्या तर आज जसा मी आहे
तसा कधीच घडलो नसतो!” साठे बाई म्हणाल्या, ‘शैलेश जर
माझ्या वर्गात नसता तर मला कधीही कळल नसत
की शिक्षकाने आधी प्रत्येक मुलाची आई असण जास्त
जरुरीच आहे, मग शिक्षक होणे.”
“माझी इथे आलेल्या सर्व शिक्षकांना विनंती आहे.
तुमच्याही वर्गात एक शैलेश असेल.
तुम्ही जेंव्हा सोमवारी पुन्हा शाळेत तुमच्या वर्गावर जाल,
तेंव्हा तुम्हीही त्या ‘शैलेशची’ आई बनु शकाल!”
तुमच्या संस्थेमध्ये तुम्ही फक्त शिक्षक म्हणून जाऊ नका.
पालक म्हणून जा. आणि मला विश्वास आहे की आपण
एका ‘शैलेश’ चे आयुष्य बदलू शकाल!”
बद्दल घडवीने हे आपले कर्तव्यच आहे

Saturday, July 12, 2014

भयसापळा, मोहसापळा आणि हौदातील थयथयाट

गुरुजी आपल्या शिष्या सोबत डोंगराच्या दिशेने चढता चढता सांगतात की, तु माझी आज्ञा पाळली तर, शिखरावर पोहचल्यावर तुला जिवनाचे अंतिम सत्य सांगतो आणी ते चालु लागतात..
"संत ज्ञानेश्वरांनी दिलेला एक दृष्टान्त"
आपण नको त्या गोष्टीत का अडकून पडतो, याचा उत्कृष्ट उलगडा करणारा आहे.
त्यांनी सांगितले आहे, की पोपट पकडण्याची एक खास पद्धत आहे.
एका आडव्या टांगलेल्या दोरीत बऱ्याच नळ्या ओवलेल्या असतात. या प्रत्येक नळीला पोपटाला आकर्षित करेल असे काहीतरी खाद्य चिकटवलेले असते.
जेव्हा पोपट नळीवर बसतो, तेव्हा त्याच्या वजनाने नळी गोल फिरते व पोपट उलटा लटकतो. उलटे लटकताच पोपट स्वाभाविकपणे पायात नळी गच्च पकडतो.
ही अवस्था पोपटाने कधीच अनुभवलेली नसते. नळी सोडली की आपण पडू, असेच त्याला वाटत
राहते.
खरे तर नळी सोडल्यानंतर पडू लागताच पंखांचा वापर करून एक गिरकी घेऊन तो सहज उडू शकणार असतो.
पण हे "ज्ञान' त्याला होत नाही व तो नळी अधिकच गच्च पकडून लटकलेला राहतो व पकडणाऱ्याच्या हाती पडतो. याला भयसापळा असे म्हणता येईल.
जेव्हा आपला पोपट झाला आहे असे वाटते व तरीही आपण त्या परिस्थितीतून सुटूच शकत नाही,
तेव्हा आपण कशाला भीत आहोत ते नेमके पाहावे.
"हा आधार गेला तर," अशी भीती असते तेव्हा. जर काही काळ निराधार व्हायची तयारी दाखवली, तर आपणही उडून जाऊ शकत असतो. पडायची शक्यता ज्याला जराही नको वाटते, तो उडू शकत नाही!
माकडे पकडायचीदेखील एक खास पद्धत आहे.
(हा दृष्टान्त मुळात कोणाचा हे आठवत नाही)
एक मडके मातीत पुरून ठेवतात. मडक्यात एक फळ असते माकड ते फळ काढण्यासाठी मडक्यात हात घालते. मडक्याचे तोंड हे अगदी नेमक्या आकाराचे बनविलेले असते; असे की फळ सोडून दिले तर माकडाचा हात बाहेर निघू शकेल; पण फळासकट हात बाहेर काढायला जावे, तर हाताचा आकार वाढल्याने हात अडकेल. माकडाच्याने फळ सोडवतही नाही आणि त्यामुळे हात बाहेर काढता येत नाही. निर्णय न घेता येण्याच्या या "अवस्थे'त माकड मनाने अडकते व
शरीराने मडक्यापाशी. या सापळ्याला मोहसापळा असे म्हणता येईल.
आपले ज्या परिस्थितीत "माकड' झाले असेल, तीत असे काय आहे की ज्याचा मोह आपल्याच्याने सोडवत नाहीये, हे जर बघता आले तर कदाचित ती गमावणूक वाटते तेवढी मोलाची नसेलसुद्धा!
थोडेसे सोडून देऊन संपूर्ण सुटता आले तर वाईट काय? निदान या मर्यादित अर्थाने "फलत्याग' नक्कीच मुक्तिदायक नाही काय?
एक जण हौदात कमरेइतका उतरून बराच थयथयाट करतोय, हातांनी पाणी खळबळवतोय.
या हौदानं माझी काहीतरी मूल्यवान वस्तू गिळलीय म्हणून मी संतापलोय, असं त्याचं म्हणणं.
"अरे तू शांत हो म्हणजे पाणी स्थिर होईल आणि मग तुला तळ दिसेल व वस्तूही सापडेल!" कोणीतरी समजावत आहे.
पण हा ऐकूनच घ्यायला तयार नाही. हौदाचा तळ रिकामाच आहे आणि मी केलेला थयथयाट व्यर्थ होता, हे स्वतःला कळू न देण्यासाठी तर तो पाणी फेसाळलेलं ठेवत नसेल?
अंतीम सत्त्य
"दमलास? चल परत जाऊ. आज इतकं पुरे. पुन्हा कधीतरी जाता येईलच.
""नाही गुरुजी.
मी दमलोय; पण आपण इतके वर आलोय, आज शिखरावर पोहोचायचंच! कधी एकदा पोहोचतोय आणि मग तुम्ही ते सत्य सांगताय, असं झालंय मला.''
"माझं वचन नीट आठव. ही मोहीम पुरी होईपर्यंत, जर माझी आज्ञा तू निरपवादपणे पाळलीस, तर ते
सत्य सांगेन' असं म्हणालो होतो मी.''
"होय गुरुजी. पण आता शिखर जवळ आलं असेल. इतकं वर आल्यावर सोडून द्यायचं म्हणजे..''
"कितीही वर आलो असू! तरी मी सांगतो म्हणून, हे सगळे कष्ट वाया जाऊ द्यायला तू तयार आहेस का नाही?''
"ठीक आहे गुरुजी. मी आजची सगळी धडपड वाया जाऊ द्यायला तयार आहे. म्हणत असाल तर परत जाऊ या.''
"शाबास! आता मी तुला ते सत्य सांगतो''.
"पण शिखर न येताच?''
"तसं नव्हे. तू परतीला तयार झालास म्हणून!"
ते सत्य हे आहे, की शिखर असं नाहीच.
ही अंतहीन चढण आहे आणि ज्या तळापासून आपण निघालो ना, तेच खरं पोचण्याचं स्थान होतं!
तू उत्तीर्ण झालास. चल आता तिथं जाऊ, जिथं आपण असतोच;
फक्त "पोहोचलो' असं वाटत नसतं इतकंच!
पोपटानं एकदा तरी आधार सोडून पाहावा.
माकडानं एकदा तरी फळ सोडून पाहावं,
थयथयाट करणाऱ्यानं एकदा तरी खळबळ थांबवून तळ पाहावा.
चढणाऱ्यानं एकदा तरी शिखराचा हट्ट सोडून पाहावा.
हे जमायला अवघड नसतं. पटायलाच अवघड असतं.
भयसापळा, मोहसापळा हे माणसाच्या मनातूनच तयार झालेले असतात.
त्यामुळे त्यातून बाहेर पडणे अवघड नसते;
पण सुटकेचा हा मार्ग सोपा असला तरी पटायला अवघड असतो.. .

Sunday, July 6, 2014

डॉक्टरची गोष्ट

एका डॉक्टरला ऑपरेशन साठी कॉल
आला... खुप
घाई करून
तो डॉक्टर हॉस्पिटल मध्ये
पोहोचला... त्याने
पटकन
सगळ्या नर्स
ऑपरेशनची तयारी करण्यास
सांगितले,
स्वतःचे कपडे बदलले, आणि पटकन
ऑपरेशन
थिएटर जवळ
आला...
तिथे त्याने पाहिले की एका मुलाचे
वडील हॉल
बाहेर रागात
चकरा मारताय आणि डॉक्टर ची वाट
पाहताय...
डॉक्टरांना पाहताच
त्या मुलाच्या वडिलाचा पारा चढला व
ते
रागातच डॉक्टर ला म्हणाले
"तुम्ही इथे
यायला इतका वेल
का घेतला? तुम्हाला कळत
नाही का माझ्या मुलाचे प्राण
धोक्यात आहे ते?
तुम्हाला काही जबाबदारी ची जाणिव
आहे
की नाही?"
यावर डॉक्टर स्मितहास्य देत
म्हणाला "मला माफ करा,
मी हॉस्पीटल मध्ये नव्हतो, मी फोन
आल्यानंतर
जितक्या लवकर येता आले
तितक्या लवकर आलो,
आणि आता मी प्रार्थना करतो की तुम्ही शांत
व्हा..
मला माझ काम करू द्या"
"शांत व्हा?? जर
तुमचा मुलगा आता ऑपरेशन
थिएटर मध्ये
असता तर?? जर
तुमचा स्वतःचा मुलगा आता मृत्यु
च्या जबड्यात असता तर तुम्ही काय
केल
असतं??" वडील
रागात म्हणाले...
डॉक्टर पुन्हा एकदा स्मितहास्य देत
म्हणाले
"मी तेच
सांगतो जे पवित्र पुस्तकांमध्ये
लिहिलेले आहे
की हे शरीर
नश्वर आहे, शरीर मातीतुन तयार झाल
आणि शेवटी मातीतच
मिसळणार, अगदी आम्ही डॉक्टर
जरी असलो तरी आम्ही काय देव नाही..
आता तुम्ही शांत
व्हा आणि देवा जवळ प्रार्थना करा...
मी माझे
पुर्ण प्रयत्न
करतो..."
आणि असे म्हणत डॉक्टर ऑपरेशन थिएटर
मध्ये
गेला तसे
वडिल त्या डॉक्टरकडे रागातच पहात
राहिले
आणि काही तासांनंतर डॉक्टर आनंदात
बाहेर
आले
आणि त्या मुलाच्या वडिलांना म्हणाले
"अभिनंदन ऑपरेशन यशस्वी झालं...
आम्ही तुमच्या मुलाला वाचावल"
त्यावर मुलाच्या वडिलांचा आनंद
गगनात
मावेनासा झाला...
ते डॉक्टर ना धन्यवाद म्हणाले..
डॉक्टरांनी त्याना काहीही प्रतिक्रीया दिली नाही आणी ते
तसेच तिथुन ताडकन निघुन गेले...
यावर मग वडिलांना आश्चर्य
झाला आणि ते
शेजारी उभ्या असलेल्या नर्स
ला रागात
म्हणाले
"किती गर्विष्ठ आणि माजोरा आहे
हा डॉक्टर"
त्यावर ती नर्स रडत
म्हणाली "त्या डॉक्टरांचा मुलगा काल
अपघातात वारला... आज ते
त्याचा अंतिम
संस्कार करत होते
जेव्हा आम्ही त्यांना तुमच्या मुलाच्या ऑपरेशन
साठी फोन
केला... आणि ते स्वतःच्या मुलाचा अंतिम
संस्कार अर्धवट
सोडुन घाईने तुमच्या मुलाच्या ऑपरेशन
साठी आले
आणि आता अंतिम संस्कार पुर्ण
करण्यासाठि पटकन गेले...
अहो ज्यांचा स्वतःचा एकुलता एक
मुलगा मेला तो काय गर्व
आणि माज करणार"
हे ऐकुन त्याच्ये वडिल सन्न झाले..
आणि त्यांना खुप
पश्चाताप झाला...
सबक- कधीच कुणाबद्दल काहीही बोलुन मोकळे होऊ नये
कारण तुम्हाला नसतं माहित त्याने
काय भोगलय...

रिकामा ग्लास

मानसशास्त्राचा तास होता .
एका शिक्षिकेने
अर्धा भरलेला पाण्याचा ग्लास हातात
धरला आणि सर्व विद्यार्थ्यांवर एक
नजर टाकली .
प्रत्येकाला वाटले की आता मॅडम
विचारतील
की हा ग्लास भरलेला आहे की रिकामा ?
पण एक स्मित हास्य करुन मॅडम ने
प्रश्न केला, "या ग्लासचं वजन
किती असेल कुणी सांगेल का ?"
कुणी म्हणालं 100 ग्रॅम तर
कुणी 200
ग्रॅम . एक जण तर
म्हणाला - मॅडम, अर्धा किलो !
मॅडम ने पुन्हा एकदा स्मित हास्य करुन
बोलण्यास सुरुवात केली, " याचं वजन
मोजमाप करुन सांगितल्याने
फारसा फरक पडणार नाही !
मुळात वजन काहिही असो, जर
का मी हा ग्लास एक
मिनीट असाच धरुन ठेवला तर
मला काही त्रास होणार नाही . एक तास
धरुन ठेवला तर हात दुखेल .
आणि दिवस
भर असाच ठेवला तर ... ? तर हात खुप
जड होईल,
ईतका की बधीर होउन निकामीच
ह्वावा ...
आपल्या आयुष्यातील तणाव अन्
चिंतांच पण असंच असतं . क्षण भर
विचार करा , काही वाटणार
नाही . पण
मनात धरुन बसाल तर ... तुमचं मन
पण असंच जड होत होत
बधिर होईल ! ईतकं
की तुम्ही काही करुच शकणार
नाहीत ! तेव्हा व्यर्थ चिंता करणं
सोडा . मनाला हलकं करा .
आणि निरंतर अल्हाद दायक जिवन
जगायला शिका ...
आयुष्य खुप सुंदर आहे

Saturday, June 28, 2014

गोष्ट

मराठी स्क्रॅप - नक्की वाचा ही गोष्ट...आणि आवडल्यास शेअर
करा...!!!
एक आंधळा भिकारी रस्त्यावर
एका बाजूला बसलेला... त्याच्याकडे कुणाचेही लक्ष
नाही... तो एव्हढा दरिद्री आहे की त्याला अश्रू
देखील महाग झालेत.... गेली कित्येक वर्षे
तो रडलेला नाही.
.
.
एक लेखक पूर्णपणे दिवाळं वाजलेला...
.
.
.
खिचात दमडादेखील नसतांना तो लेखक फिरायला बाहेर
पडतो.
.
.
त्याची नजर त्या भिका-याकडे
आणी त्याच्या त्या करूण अवस्थेकडे जाते.
.
.
त्या भिक-याच्या बाजूला एक पाटी आणि दोन-तीन
खडू पडलेले.
.
.
हा लेखक त्या भिक-याकडे जातो आणि म्हणतो..
.
.
"मित्रा, मी एक लेखक आहे,ज्याच्याकडे एक
दमडादेखील नाही, पण माझ्याकडे
कला आहे,...माझ्याकडे शब्दांची शक्ती आहे..
ती मी तुला देउ शकतो...तुझ्या परवानगीने
मी या पाटीवर काही लिहू का?"
.
.
"साहेब" भिकारी म्हणतो "
माझ्याशी कुणी बोलतदेखील नाही ...मी एक गरीब
आंधळा भिकारी ...तुम्हाला त्या पाटीचं जे ठीक वाटतं
ते करा."
.
.
तो लेखक त्या पाटीवर काहीतरी लिहून निघुन जातो.
.
.
त्या क्षणापासून भिका-याच्या लक्षात येते की,
एकदम जाणा-या येणा-यांपैकी प्रत्येकजण
त्याच्याजवळ थांबून त्याच्यापूढ्यात पैसे टाकू
लागलाय.
.
.
थोड्याच वेळात तिथे पैशाची रास जमते...
.
.
तो भिकारी बेचैन होतो...नाण्यांची रास वाढतच
जाते...
.
.
तो एव्हढा अस्वस्थ होतो की पैसे टाकणा-
यांपैकी एकचा हात पकडतो आणि म्हणतो " साहेब
माफ करा तुमचा हात पकडल्याबद्दल ... मी एक
गरीब आंधळा भिकारी आहे...मला कृपा करुन जर
या पाटीवर काय लिहीलंय ते वाचून दाखवलेत तर फार
उपकार होतील."
.
.
तो माणूस पाटी उचलतो आणि वाचायला लागतो...
.
.
.
.
"वसंत ऋतू, बहरलेली सृष्टी,
आणि माझ्या नशिबी हरवलेली दृष्टी."
.
.
.
.
भिका-याच्या गालावरुन अश्रू ओघळायला लागतात.
.
.
.
आयुष्य कुणी जास्त जाणलं?
या ओळी लिहीणा-या लेखकानं? त्या ओळी वाचून पैसे
टाकणा-या लोकांनी? कि इतक्या वर्षांनी रडणा-
या त्या भिका-यानं??
तुमचे डोळे चांगले असतील तर तुम्ही जगाच्या प्रेमात पडाल
पण जर तुमची जीभ गोड असेल तर हे जग तुमच्या प्रेमात पडेल...

Friday, May 9, 2014

जगणे (प्रा) अनलिमिटेड !

पोस्ट जरा मोठी आहे पण जरुर वाचा..बघा काही फरक पडतोय का आपल्या आयुष्यात...
प्रत्येकाने वाचावा असा नविन काळेंचा अप्रतिम लेख !
जगणे (प्रा) अनलिमिटेड !
दोन दिवसांपूर्वीची गोष्ट. कुटुंबासह कुठल्यातरी मॉलमध्ये होतो. मुलगा ‘प्ले झोन’ मध्ये, सौ. (विन्डो) शॉपिंगमध्ये आणि मी एसीची छान गार हवा अंगावर घेत एका कोपऱ्यात पेपर वाचत बसलो होतो. पेपर खरं तर, नावाला. माणसं वाचत बसलो होतो. विविध चेहऱ्यांची, आकारांची माणसं जणू ‘आज जगाचा शेवटचा दिवस असावा’ असे भाव आणून शॉपिंग करत होती. (एवढ्या वस्तू विकत घेऊन माणसं त्या वस्तू घरात कुठे ठेवतात, हा मध्यमवर्गीय प्रश्न मला कायम सतावतो.असो.)
माझं ‘माणसं-वाचन’ चालू असतानाच माझ्या शेजारी एक तरुण येऊन बसला. जेमतेम चाळीशीचा असावा. जीन्स आणि खोचलेला टी शर्ट. पायात बूट. अंगावर ब्रुट. हातात मराठी पुस्तक. खिशातला शुभ्र रुमाल काढून त्याने कपाळावरचा घाम पुसला. रुमालाची (होती तशी) व्यवस्थित घडी घातली आणि (त्याच) खिशात ठेवली. त्याच्या हालचाली शांत झाल्यावर त्याने पुस्तक उघडले. ते पुस्तक माझ्या आवडत्यांपैकी एक होतं. न राहवून मी म्हटलं, ‘मस्त पुस्तक आहे.’ त्याने माझ्याकडे बघत हसून मान हलवली.
पाच एक मिनिटांनी तो माझ्याकडे वळून म्हणाला,’वाचन आवडतं?’
‘प्रचंड. रीडिंग इज माय ‘फर्स्ट लव्ह’.’ आजूबाजूला ‘सौ’ नाही हे बघत मी म्हटलं.
‘किती वाचता रोज?’
‘रोज असं नाही…अं.. अं…काही खास ठरवलेलं नाही. इच्छा झाली की वाचतो.’ अनपेक्षित योर्करला कसंबसं खेळत मी म्हटलं.
‘खायला आवडतं?’ कॉन्जीक्युटीव्ह योर्कर.
‘प्रचंड. इटिंग इज माय ‘सेकंड लव्ह’.’
‘हो? मग रोज जेवता की इच्छा होईल तेव्हा….?’
‘नाही नाही…रोज दोन वेळा..आणि मधे-मधे काहीना काही खादाडी चालू असतेच.’ हिट विकेट !
तो तरुण हसला. म्हणाला, ‘मी दिवसभरात एक तास वाचतो. वाचल्याशिवाय झोपत नाही. आंघोळ, जेवण..तसंच वाचन !’
‘बरा वेळ मिळतो तुम्हाला.’ दयनीय चेहरा करत मी म्हटलं.
‘वेळ मिळत नाही. मी काढतो. ‘वेळ’ ही जगातली सगळ्यात ‘टेकन फॉर ग्रान्टेड’ गोष्ट आहे असं मी मानतो. फॉर दॅट मॅटर, आयुष्यच घ्या ना ! फारच गृहीत धरतो आपण आयुष्याला ! ‘मी रिटायर झाल्यावर भरपूर वाचन करणारे’ असं कोणी म्हटलं ना, की माझी खात्री आहे, नवज्योत सिंग सिद्धूसारखा रेड्यावर हात आपटत तो ‘यम’ हसत असेल !’
मी हसलो. तसा किंचित गंभीर होत त्याने विचारलं, ‘तुम्ही कधी पाहिलंय यमाला?’
मी आणखी हसू लागलो.
‘आय अॅम प्रीटी सिरीयस. तुम्ही पाहिलंय यमाला ? मी पाहिलंय. दोन वर्षांपूर्वी. रस्ता क्रॉस करत होतो. समोरून भरधाव गाडी आली. त्या दिव्यांच्या प्रकाशझोतातही मी अंधार पाहिला. त्या दोन सेकंदात मला ‘मृत्यूने’ दर्शन दिलं. त्यानंतर जागा झालो तो हॉस्पिटलमध्येच. गंभीर इजा होऊन सुद्धा मी कसाबसा वाचलो होतो. हॉस्पिटलमधून घरी आलो तो नवा जन्म घेऊन. मी ‘देव’ पाहिला नव्हता पण ‘मृत्यू’ पाहिला होता. मृत्यू तुम्हाला खूप शिकवतो. माझी मृत्यूवर श्रद्धा जडली. आजूबाजूला रोज इतके मृत्यू दिसत असूनही ‘मी’ अमर राहणार असं ज्याला वाटतं, तो माणूस ! तुम्हाला माहितीय, माणूस मृत्यूला का घाबरतो?’
‘अर्थात ! मृत्यूनंतर त्याचे सगे सोयरे कायमचे दुरावतात. मृत्यूमुळे माणसाच्या इच्छा अपूर्ण राहतात.’ मी म्हटलं.
‘साफ चूक ! माणूस यासाठी घाबरतो कारण मृत्यूनंतर ‘उद्या’ नसतो !’
‘मी समजलो नाही.’
‘प्रत्येक काम आपल्याला ‘उद्यावर’ टाकायची सवय असते. वाचन, व्यायाम, संगीत ऐकणे…गंमत म्हणजे, आहेत ते पैसे देखील आपण ‘आज’ उपभोगत नाही. ते कुठेतरी गुंतवतो. भविष्यात ‘डबल’ होऊन येतील म्हणून ! या ‘उद्या’ वर आपला फार भरवसा असतो. मग तो आपल्या जगण्याचा एक भाग बनतो. आपण मृत्यूला घाबरतो कारण मृत्यू तुम्हाला हा ‘उद्या’ बघायची संधी देत नाही ! मृत्यू म्हणजे – आहोत तिथे, आहोत त्या क्षणी फुल स्टॉप ! खेळ ऐन रंगात आला असताना कुणीतरी येऊन तुम्हाला खेळाच्या बाहेर काढावं, तसा मृत्यू तुम्हाला या जगातून घेऊन जातो. तुमच्यावरील या ‘अन्याया’विरुद्ध आवाज उठवायला देखील तुम्ही उरत नाही..माझ्या मृत्यूनंतर मी माझा लाडका ‘उद्या’ पाहू शकणार नाही, या हतबलतेला माणूस सगळ्यात जास्त घाबरतो. म्हणून हॉस्पिटलमधून घरी आल्यावर ठरवलं, यापुढचं आयुष्य उघड्या डोळ्यांनी जगायचं. इतके दिवस जेवण नुसतंच ‘गिळलं’. या पुढे एकेका घासाचा मजा घ्यायचा. आयुष्याची ‘चव’ घेत जगायचं. ’
‘म्हणजे नक्की काय केलं?’माझी उत्सुकता आता वाढली होती.
‘माझ्या आयुष्याची जबाबदारी मी स्वतःवर घेतली. मी माझ्या आयुष्याचा Chief Executive Officer झालो !’
‘कंपनीचा सीईओ इतपत ठीक आहे. आयुष्याचा ‘सीईओ’ वगैरे…जरा जास्तच होत नाही का?’ मी विचारलं.
‘वेल…तुम्हाला काय वाटतं हे माझ्यासाठी महत्वाचं नाही. आयुष्य कसं जगायचं याचे नियम मी ‘माझ्यापुरते’ केलेत. त्यामुळे…’
‘मग..तुमच्या कंपनीत किती माणसं आहेत?’ त्याला मधेच तोडत, मस्करीच्या सुरात मी विचारलं.
‘म्हटलं तर खूप, म्हटलं तर कोणीच नाही.’ तो खांदे उडवत म्हणाला.
मला न कळल्याचं पाहून तो पुढे बोलू लागला. ‘मी फक्त माझ्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स सोबत डील करतो. दे व्हर्च्युअली कंट्रोल माय लाईफ.
माझ्या बोर्डवर विविध माणसे आहेत. फरहान अख्तर, आमीर खान, शिवाजी महाराज, अब्दुल कलाम, चार्ली चॅप्लीन, गांधीजी, अमिताभ, हेलन केलर, जे आर डी टाटा…..’
माझ्या चेहऱ्यावरील बदलत जाणारे भाव न्याहाळत त्याने आणखी काही नावे घेतली.
‘या लोकांबद्दल वाचलं तेव्हा एक लक्षात आलं. या प्रत्येकामध्ये काहीना काही वैशिष्ट्य आहे. काही क्वालिटीजमुळे मला ही माणसं ग्रेट वाटतात. मी काय करतो…अं…उदाहरण देतो…समजा खोटं बोलण्यावाचून पर्याय नाही अशा परिस्थितीत सापडलो की माझे ‘एथिक्स डायरेक्टर’ गांधीजींना विचारतो, काय करू? मग ते सांगतील ते करतो. व्यायाम करायला जाताना सकाळी उठायचा कंटाळा आला तर माझे ‘हेल्थ डायरेक्टर’ फरहान अख्तर मला काय म्हणतील, या विचाराने मी उठून बसतो आणि व्यायाम करायला जातो. कधीतरी काहीतरी घडतं आणि खूप निराश वाटतं. मग माझ्या ‘इन्स्पीरेशन डायरेक्टर’ हेलन केलरना पाचारण करतो. त्यांना भेटून आपल्या अडचणी फारच मामुली वाटू लागतात. कधी दुःखी झालो तर ‘इंटरटेनमेंट डायरेक्टर’ चार्ली चॅप्लीन भेटायला येतात…’
माझ्या चेहऱ्यावरील विस्मयचकित भाव पाहून तो म्हणाला..’मला माहितीय की ऐकायला हे सगळं विचित्र वाटत असेल. पण एक गोष्ट सांगतो. आयुष्य जगणं ही जर परीक्षा असेल, तर प्रत्येक माणसाने स्वतःचा ‘सीलॅबस’ बनवावा हे उत्तम ! आपण अनेकदा ‘इतरांप्रमाणे’ आयुष्य जगायचा प्रयत्न करतो आणि तिथेच फसतो. जगायचं कसं? या प्रश्नावर चिंतन करणारी लाखो पुस्तके आज बाजारात आहेत. हजारो वर्षे माणूस या प्रश्नाचं उत्तर शोधतोय. गौतम बुद्धांनी मात्र फक्त चार शब्दांत उत्तर दिलं -Be your own light. मला तर वाटतं, याहून सोपं आणि याहून कठीण स्टेटमेंट जगात दुसरं नसेल !’
मी त्या तरुणाला नाव विचारलं. त्याने सांगितलं. आम्ही एकमेकांचा निरोप घेतला.
चार पावलं चालून गेल्यावर तो तरुण पुन्हा वळून माझ्याकडे आला. म्हणाला, ‘सगळ्यात महत्वाचं सांगायचं राहिलं. मी एका अॅक्सिडेंटमध्ये वाचलो आणि इतकं काही शिकलो. तुम्ही…प्लीज..कुठल्या अॅक्सिडेंटची वाट पाहू नका !’ आम्ही दोघेही हसलो.
अपघात फक्त वाहनांमुळेच होतात, असं थोडीच आहे? ओळखपाळख नसलेला तो तरुणही अपघातानेच भेटला की !
घरी जायला आम्ही रिक्षात बसलो. ‘प्ले झोन’मध्ये खेळून पोरगं आधीच दमलं होतं. वाऱ्याची झुळूक रिक्षात येऊ लागली. मांडीवर बसल्या बसल्या मुलगा झोपून गेला होता. त्याच्या मऊ मऊ केसांमधून हात फिरवताना संध्याकाळच्या गप्पा आठवत होत्या.
मनात आलं, ‘आपल्या पोराने जर असे ‘बोर्ड ऑफ डायरेक्टर्स’ नेमले, तर त्यात ‘त्याचा बाप’ असेल का?’
परवाच्या रात्री बराच वेळ जागा राहिलो.
कोण जाणे, कदाचित हाच प्रश्न यापुढील आयुष्य ‘चवीने’जगत राहायची उर्जा देत राहील !
----नविन काळे

मौल्यवान काय? सोने की चांदी?



एका गावात एक विद्वान अर्थतज्ञ रहात होता . त्याची ख्याती सर्वदूर
पसरलेली होती ...तिथल्या स्थानिक गावाच्या राजाने
एकदा चर्चा करायला त्याला बोलवले . तो विद्वान राजाला भेटायला गेला .
भरपूर वेळ चर्चा झाली मग राजा त्या विद्वानाला म्हणाला " महाशय
तुम्ही अर्थशास्त्रात खरेचं फार विद्वान आहात पण मग तुमचा मुलगा
असा बावळट का ? काही त्याला शिकवा त्याला सोने आणि चांदी यात
जास्त मुल्यवान काय साधे ईतके सुध्दा कळत नाही " आणि मोठ्याने
हसू लागला हे ऐकून त्या विद्वानाला फार वाईट वाटले ...
तो घरी गेला .... त्याने मुलाला विचारले
" बाळा मुल्यवान काय आहे सोने का चांदी ? "
" सोने " क्षणाचाही विलंब न लावता मुलगा उत्तरला
" हो तुझे उत्तर बरोबर आहे . मग तो राजा असा का हसला ?
म्हणाला तुला सोने आणि चांदी यात मुल्यवान काय माहीत नाही ..!
त्याने तुझ्यावर असला आरोप का लावला . या आधीपण लोकं मला
या बाबी वरुन हसायचे पण आता माझी चार लोकात खिल्ली
उडवली जाते .. तुला माहीत आहे मुल्यवान काय आहे
मग लोकं असे का करतात सांग मला"
" लोकांवर रुबाब करायसाठी आणि प्रतिष्ठा जपण्यासाठी
राजा रोज त्याच्या वाड्याजवळ छोटा दरबार भरवतो ...
रोज मी शाळेत जातो त्या रस्त्यातचं राजाचा वाडा आहे
मी दिसताचं राजा मला बोलवून घेतो .. त्याच्या सोबत गावातील
सारे लोकं प्रतिष्ठीत तिथेचं असतात .... राजा एका हातात
सोन्याचे नाणे आणि एका हातात चांदीचे नाणे माझ्या समोर
धरतो आणि मला सांगतो यातले सगळ्यात किंमती नाणे उचल ..
आणि मी चांदीचे नाणे उचलतो .. त्यामुळे तिथे असलेले सगळे
मोठ्याने हसतात ... सार्‍यांना मजा वाटते ....... असे रोज घडते
पण मला सोने आणि चांदी याचे मुल्य कळत नाही असे त्यांनी
तुम्हाला का सांगीतले मला खरचं माहीत नाही ......."
विद्वान मुलाचे हे उत्तर ऐकून खूप विचारात पडला
मुलाला सोने चांदी यातला फरक कळतो तरी हा रोज असे का करतो
चांदीचे नाणे मुल्यवान म्हणून उचलतो हे मात्र त्याला उमगले नाही
न राहून त्याने मुलाला विचारले " मग तु सोन्याचे नाणे का उचलत नाही ?
असल्या मुर्खपणा करुन माझी अब्रु चार लोकात का काढतो ?"
मुलगा जरा हसला मग विद्वानाचा हात धरुन त्याला आत घेवून गेला
कपाटातून त्याने एक पेटी काढली आणि उघडली ती पेटी चांदीच्या
नाण्यांनी भरलेली होती हे पाहून विद्वान अवाकचं झाला ..
मुलगा म्हणाला " ज्या दिवशी मी सोन्याचे नाणे उचलेल त्या दिवशी
हा खेळ बंद होईल .. त्यांना मला मुर्ख सिध्द करुन मजा येत असेल
तर येवू द्या .. पण जेव्हा मी हुशार होईल तेव्हा मला काहीचं मिळणार नाही
मुर्ख असणे वेगळे आणि मुर्ख समजणे वेगळे "


जीवनातही असे बर्‍याचं वेळा होते कोणाला मूर्खात काढण्यासाठी
आपण विनाकारण आपले नुकसान करुन घेतो .. आणि कधी
कोणी विनाकारण आपणास मुर्खात काढते पण त्यातून आपला फायदाचं होतो
हा एक खेळचं असतो कोणी हरत जिंकते आणि कोणी फक्त जिंकते .....
कोणी जिंकताना दिसते आणि कोणी न दिसताचं जिंकते ......
कोणत्याही बाजूला राहून खेळा ... मात्र नेहमीचं सकारात्मक असा.....
कोणी आपणास किती ही मुर्खात काढले तरी उगाच मनाला त्रास नका
करुन घेवू ... त्या गोष्टीला सकारात्मकतेने सामोरे जा आणि
सोन्याची एक संधी साधण्या पेक्षा प्रत्येक संधीचे सोने करा ...
काय वाटते ????

पैसे

पैसे नसतात तेव्हा माणूस
झाडपाला खाऊन दिवस काढतो
पैसा आल्यावर
हाच झाडपाला सलाड म्हणून हॉटेलात खातो


पैसे नसतात तेव्हा
माणूस सायकलने रपेट करतो,
पैसा आल्यावर मात्र
हीच सायकल तो जिममध्ये व्यायामासाठी चालवतो.

पैसे नसतात तेव्हा
रोजीरोटीसाठी त्याची पायपीट
चालू असते.
पैसे आल्यावर मात्र
हीच पायपीट तो चरबी कमी करण्यासाठी करतो.

माणूस स्वत:शीच प्रतारणा करीत असतो.
पत नसली तरी
लग्न करायला एका पायावर तयार असतो,
ऐपत असली की मात्र
त्याला घटस्फोट हवा असतो.

पैसे वाचवायला
तो कधी बायकोलाच आपली सेक्रेटरी बनवितो,
पुढे पैसा आला की
सेक्रेटरीलाच बायको सारखे वापरतो.

पैसे नसेल तेव्हा
तो असल्याचे सोंग आणतो,
पैसा असतो तेव्हा मात्र
कंगाल असल्याचे नाटक करतो.

पैसे नसतात तेंव्हा
मिठाई खावीशी वाटते
पैसे आल्यावर
मधुमेहा मुळे खाता येत नाही.

पैसे नसतात तेंव्हा
भूक लागते , झोप येते
पैसे आल्यावर
दोन्हीसाठी औषध घ्यावे लागते.

माणसा रे माणसा...
तू वास्तव तरी कधी स्वीकारतोस?
आपल्या सावली पासून आपणच शिकावे
कधी लहान तर कधी मोठे होऊन जगावे
शेवटी काय घेऊन जाणार आहोत सोबत
म्हणून प्रत्येक नात्याला हृदयातून जपावे ॥